औंध : ‘कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाचे सोने झाले. मी ही त्यातील एक विद्यार्थी असून, माझ्यासारखे हजारो विद्यार्थी झोपडपट्टी परिसरातून शिक्षणासाठी येत होते; मात्र त्यांना प्रतिष्ठित महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता. अशा वेळेस डॉ. आंबेडकर महाविद्यालयाने आमच्यासारख्या मुलांना शिक्षणाच्या प्रक्रियेत सामावून घेतले म्हणून आमच्या आयुष्याचे सोने झाले,’ असे प्रतिपादन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि पैलवान विकास राजवाडे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अलीकडेच माजी विद्यार्थी सहविचार सभा आयोजित केली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, क्रीडा संचालक प्रा. भीमराव पाटील, प्रा. तानाजी हातेकर, प्रा. आसावरी शेवाळे, प्रा. डॉ. शशी कराळे, प्रा. नलिनी पाचर्णे, डॉ. संजय नगर, आयक्यूएसी समन्वयक डॉ. सविता पाटील, प्रा. सुप्रिया पवार, प्रा. मयुर माळी प्रा. किरण कुंभार, प्रा. कुशल पाखले यांसह विद्यार्थी उपस्थित होते.
राजवाडे म्हणाले, ‘संस्थेच्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा वीस वर्षांपूर्वीचा विद्यार्थी आहे. त्यावेळी पांडव नगर याठिकाणी वडारवाडीतील महाविद्यालयात शिकत होतो. आम्ही शिंदे सरकार वाड्यात आल्यावर देखील मोडकळीस आलेल्या खोल्यांमधून शिक्षण घेत होतो. आज या महाविद्यालयाने कात टाकली आहे. आजही कर्मवीरांच्या विचारांचा वारसा घेऊन हे महाविद्यालय शहरातील झोपडपट्टी परिसरातील मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण देण्याचे कार्य करीत आहे. त्यामुळे आजी-माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने व सहकार्याने या महाविद्यालयास मदत करावी.’
प्रा. डॉ. किरण भिसे म्हणाले, ‘माझ्यासारखा सामान्य घरातील मुलगा प्राध्यापक, डॉक्टर होतो हा या महाविद्यालयाचा बहुमान आहे. त्यामुळे आपण सर्व माजी विद्यार्थी महाविद्यालयाच्या विकासात सहभाग घेतला पाहिजे.’
माजी विद्यार्थी व मुख्याध्यापक विलास घोगरे यांसह अनेक माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करतानाच महाविद्यालयाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यामध्ये साहेबराव बनसोडे, श्री. वाघमारे, सुरेश सोनवणे, भरत मेकाले, गोकुळ ठोसर आदी माजी विद्यार्थ्यांचा समावेश होता.
महाविद्यालयाचे उपप्राचार्या डॉ. सदाफळ म्हणाले, ‘येत्या काही दिवसांत रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत माजी विद्यार्थ्यांच्या समवेत महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी आजी-माजी विद्यार्थ्यांनी सर्वतोपरी सहकार्य करून माजी विद्यार्थ्यांचा मेळावा यशस्वी करावा.’
क्रीडा संचालक प्रा. भीमराव पाटील म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी केवळ आर्थिकच नव्हे, तर आपण ज्या-ज्या क्षेत्रात कार्यरत आहात त्या-त्या क्षेत्रातील ज्ञान आणि कौशल्यांबाबत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.’
महाविद्यालयातील आयक्यूएसी विभागाच्या चेअरमन डॉ. पाटील यांनी महाविद्यालयाच्या नॅक मूल्यांकनात माजी विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असून, त्यांनी अभ्यासक्रमाबाबत सूचना करण्यापासून, संशोधनास प्रोत्साहन देण्यापर्यंत अनेक बाबीत सहभागी होण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. संजय नगरकर यांनी केले. प्रा. भीमराव पाटील यांनी आभार मानले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाने ही सभा झाली.